सांगली - आजच्या काळात वर्षश्राद्ध म्हटले की मोठ्या प्रमाणावर जेवणावळी, धार्मिक विधी आणि खर्चिक कार्यक्रम असे चित्र पाहायला मिळते. मात्र सांगलीतील ॲड. अभिषेक खोत यांनी आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक कार्याची अर्थपूर्ण जोड देत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
वडिलांच्या स्मृती केवळ विधींपुरत्या मर्यादित न ठेवता त्यातून समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी, या भावनेतून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
माळवाडी (ता. पलुस) येथील ‘क्षितिज अभ्यासिका’ मध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. मात्र वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे विद्यार्थ्यांचा रात्रीचा अभ्यास विस्कळीत होत होता. ही अडचण त्यांचे मित्र व विक्रीकर अधिकारी श्री. संतोष चव्हाण यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ॲड. खोत यांनी तत्काळ अभ्यासिकेला इन्व्हर्टर भेट दिला. या मदतीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास आता अखंडित सुरू राहणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे.
तसेच खंडोबाचीवाडी (ता. पलुस) येथील शाळेमध्ये प्रिंटर नसल्याने शिक्षकांना साध्या प्रिंट किंवा झेरॉक्ससाठी तब्बल दोन किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. शिक्षकांची ही गैरसोय लक्षात घेत ॲड. खोत यांनी शाळेला प्रिंटर भेट दिला. त्यामुळे शिक्षकांचा वेळ वाचून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक वेळ देता येणार असल्याची भावना शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली.
वर्षश्राद्धाच्या दिवशी सांगली येथील ‘सावली बेघर निवारा केंद्रा’ मध्ये अनाथ, वृद्ध आणि निराधार व्यक्तींसाठी गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे केंद्रातील गरजूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देत ॲड. खोत यांनी एक वेगळा संकल्प जाहीर केला आहे. त्यांच्या वडिलांचे निधन वयाच्या ६४ व्या वर्षी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ येत्या पावसाळ्यात ६४ फळझाडे लावण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम दीर्घकालीन लाभदायक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळीही त्यांनी पर्यावरणपूरक भूमिका घेतली होती. नदी प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी वडिलांच्या अस्थी नदीत विसर्जित न करता आपल्या शेतात खड्डा खोदून त्यात विसर्जित केल्या. त्या ठिकाणी नारळाचे झाड लावण्यात आले असून आजही ते झाड डोलताना दिसते आणि वडिलांच्या स्मृती जपण्याचे प्रतीक बनले आहे.
याबाबत बोलताना ॲड. अभिषेक खोत म्हणाले, “वडिलांच्या आठवणी कायम राहाव्यात आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचावा, या भावनेतून मी हे प्रयत्न केले आहेत. केवळ परंपरा पाळण्यापेक्षा त्यातून समाजोपयोगी कार्य घडवणे हीच खरी श्रद्धांजली आहे.”
परंपरेला सामाजिक बांधिलकी, शिक्षणसेवा आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा ॲड. अभिषेक खोत यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकांनी अशा उपक्रमांचे अनुकरण करण्याची गरज व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment