कामगार म्हणजेसुद्धा माणूसच. पण उद्योगविश्वातील कटू वास्तव असे की, मोठ्या संस्थांच्या तुलनेत एका साध्या कामगाराचा आवाज अनेकदा किरकोळ समजला जातो. “कामगार काय करणार? मोठ्या लोकांशी भांडून उपयोग नाही…” असे सल्ले देत बहुतेक वेळा समाजच कामगाराला मागे हटायला सांगतो.
पण सांगलीतील एका कामगाराने या मानसिकतेलाच ठेंगा दाखवत कायद्याच्या जोरावर इतिहास घडवला आहे. कंपनीने अन्यायाने कामावरून कमी केले पण त्याने हार मानली नाही...!
सांगलीतील सुप्रसिद्ध दूध डेअरीत अनेक वर्षे निष्ठेने सेवा देणाऱ्या या कामगाराला अचानक कामावरून कमी करण्यात आले. नोकरी गेल्याचा मानसिक धक्का, घरखर्चाची चिंता, समाजात होणारी कुजबूज… पण या सगळ्यांपेक्षा जास्त त्याला दहन करत होता तो त्याचा झालेला अपमान.
ही वेळ होती – झुकण्याची किंवा लढण्याची... त्याने दुसरा मार्ग निवडला. कायद्याचा मार्ग स्वीकारायचा आणि सन्मान परत मिळवायचाच...!
मोठ्या संस्थेविरुद्ध एकट्याने लढणे सोपे नसते. कंपनीत नोकरी नसणे हा एक प्रश्न; पण “त्याने कोर्टात केस केली” असे ऐकून गावभर पसरलेल्या चर्चा हा दुसरा प्रश्न...
आजवर डेअरीने एकदाही कुणा कामगाराला सेवेतून कमी करून नंतर पुन्हा नोकरीत घेतले नव्हते. म्हणूनच अनेकांनी त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला. “काही उपयोग नाही… वेळ आणि पैसा वाया घालवू नको!” असं सांगितलं.
पण त्याने याकडे साफ दुर्लक्ष केले आणि कायद्यावर विश्वास ठेवला. त्याला न्याय मिळाला आणि इतिहासही घडला..!
औद्योगिक व कामगार कायद्याच्या अधिनियमानुसार कोर्टात लढा दिल्यानंतर अखेर डेअरी प्रशासनाने मागे हटत सांगितले की, "संबंधित कामगारास पुन्हा त्याच पगारावर, त्याच पदावर आणि सन्मानाने सेवेत घेतले जाईल".
हा निर्णय ऐकून तो कामगार हादरला — दु:खाने नाही, तर आनंदाने.... कारण हे फक्त त्याचे पुनर्नियुक्तीपत्र नव्हते, तर ते होते न्यायव्यवस्थेचे शिक्कामोर्तब...!
या प्रकरणात वकील म्हणून काम करताना मजा आली. माझा अशिलच माझ्यासाठी देव असतो. त्याच्या चांगल्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहतो. या केसमधील कामगाराच्या बाबतीत सांगायचे झालेस, “मित्रा, तू एवढ्या मोठ्या डेअरीला अक्षरशः झुकवले आहेस. जिथे तुझा अपमान झाला तिथेच तुला सन्मानाने परत बोलावले गेले. एका कामगाराने ठरवले तर तो कसा एका मोठ्या कंपनीला झुकवू शकतो याचे तू उत्कृष्ट उदाहरण आहेस. विश्वास आणि संयम असेल तर न्याय मिळतोच हे तू सर्वांना दाखवून दिले आहेस.
ही लढाई फक्त कायदेशीर नव्हती, तर ती आत्मसन्मानाची देखील होती. आज जे लोक अभिनंदन करत आहेत, तेच लोक त्याच्या वाईट काळात दूर गेले होते. पण हा खरा विजय आहे स्वतःवरील विश्वास बळकट करण्याचा... कामगाराला केवळ नोकरी परत मिळाली नाही तर त्याला आपली ओळख, प्रतिष्ठा आणि सन्मान परत मिळाला आहे.
या लढाईने दाखवून दिले आहे की, कामगार न झुकता जेव्हा उभा ठाकतो तेव्हा तो महान ठरतो..!
आज या कामगाराच्या जिद्दीने हजारो कामगारांना संदेश दिला आहे की,
✅ अन्याय सहन करू नका तर त्याविरुद्ध बंड करा...
✅ कायद्याचा व अधिकारांचा योग्य वापर करा...
✅ मोठा की लहान हा प्रश्न नसतो तर प्रश्न असतो धैर्याचा...
✅ न्याय मिळायला वेळ लागू शकतो, पण तो मिळतो हे नक्की...
जर तुम्हीदेखील एखाद्या अन्यायाला सामोरे जात असाल तर ही घटना कायम लक्षात ठेवा. तुमचा आवाज छोटा नाही. तो उठवण्याइतपत धैर्य असले की कायदा तुमच्या बाजूने उभा राहतो.
- ॲड. अभिषेक खोत, सांगली
मो. 9960661657
Comments
Post a Comment