ते साल होतं 1969 चे... नोव्हेंबर 1969..!
तेव्हा देशातील सर्वात जुणा व मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे विभाजन झाले होते. विभाजनानंतर केवळ दिड वर्षांनी म्हणजे 1971 मध्ये चौथी लोकसभा विसर्जीत करून मुदतपुर्व निवडणुका घेण्याचा धाडशी निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला आणि पाचव्या लोकसभा निवडणुकीत 1971 साली 518 पैकी तब्बल 352 जागांवर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील 'काँग्रेस (आर)' पक्षाने 'संघटना काँग्रेसचा' व त्यांच्या प्रचंड मोठ्या आघाडीचा पार धुव्वा उडवला.
काँग्रेसमधील त्याकाळीच्या अनेक 'बड्या' नेत्यांचा समावेश असलेल्या 'संघटना काँग्रेसला' केवळ 26 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमुळे 'खरी' काँग्रेस कोणती या विषयावर कायमचा पडदा पडला. या निवडणुकीत इंदिरा गांधींना प्रचंड मोठे यश मिळाले.
परंतु या निवडणुकीत 'संघटना काँग्रेस' एकटी न्हवती. त्यांच्यासोबत तेव्हाच्या ब-याच मोठ्या नेत्यांसोबतच जनसंघ, स्वतंत्र पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष या पक्षांची 'बडी' आघाडीपण होती.
या आघाडीने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील 'काँग्रेस (आर- अर्थात रिक्विझिशन)' पक्षाला नेस्तनाभुत करण्याचे मनसुबे बनवले होते.
'इंदिरा गांधी' विरुद्ध 'बडी आघाडी' अशीच ती लढत देशभर होती. तेव्हाच्या बहुतेक निवडणुक निरीक्षकांनी 'बड्या' आघाडीच्याच विजयाचे कयास मांडले होते. परंतु इंदिरा गांधींच्या 'काँग्रेस (आर)' पक्षाने अभूतपूर्व यश मिळवून सर्वांनाच आश्चर्याचे धक्के दिले.
इंदिरा गांधींच्या या नव्या पक्षाला 'नव काँग्रेस' असेही मानले जात होते. 'गाय-वासरू' हे चिन्ह लाभलेल्या या पक्षाला पुढे 'काँग्रेस (इंदिरा)' अशी मान्यता मिळाली व पुढे जनमानसांत 'इंदिरा काँग्रेस' असंच म्हटलं जाऊ लागलं.
'बडी आघाडी' चा सामना करण्यासाठी 'इंदिरा काँग्रेसने' काही प्रांतात 'भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी' आघाडी केली. 'प्रजासमाजवादी पक्षास' देखील या आघाडीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न झाले.
तमिळनाडूत इंदिरा काँग्रेसने 'द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक)' सोबत आघाडी केली.
प्रत्यक्षात इंदिरा काँग्रेसने 518 जागांपैकी 451 जागा लढवून त्यातील 352 जागा जिंकल्या व देशभरातील 43 टक्के मतदारांनी इंदिरा काँग्रेसलाच मते दिली.
तर 'संघटना काँग्रेसला' केवळ 26 जागांवरच समाधान मानावे लागले संपूर्ण 'बड्या आघाडीला' एकूण फक्त 59 जागा जिंकता आल्या.
या निवडणुकीनंतर 'संघटना काँग्रेसच्या' गुजरात, म्हैसूर व उत्तर प्रदेशातील बहुसंख्य आमदारांनी पक्षत्याग केला व ते इंदिरा काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यामुळे 'संघटना काँग्रेसची' तिन्ही राज्य सरकारं कोसळली.
'गरिबी हटाव'चा नारा यशस्वी-
इंदिरा गांधी यांनी 1969 पासूनच काँग्रेस पक्षातील डाव्या विचारांचे नेते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या कलाने राजकारण रेटण्याचा प्रयत्न चालवला होता. त्याचाच भाग म्हणून बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचे निर्णय घेतले गेले होते. 1971 च्या निवडणूक प्रचारातही इंदिरा गांधी यांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन आपला पाडाव करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही गोष्ट लोकांना त्या आक्रमकपणे सांगत. त्यांनी या निवडणुकीत 'गरिबी हटाव' चा नारा देऊन देशातील गरीब घटकांना आपल्याकडे खेचून घेण्यातही यश मिळवलं होतं.
असं सांगत त्यांनी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलं.
गरीबी हटावचा नारा आणि समाजवादी धोरण यामुळे 1967 नंतर काँग्रेसपासून दूर गेलेले अनेक सामाजिक गट पुन्हा काँग्रेस पक्षाकडे परतू लागले आणि 1972 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रांतात 'इंदिरा काँग्रेसला' मोठं यश मिळालं.
1971 च्या लोकसभा व 1972 च्या विधानसभा निवडणुकांतील या यशामुळे विरोधी पक्षांचा प्रभाव कमी झाला आणि 'इंदिरा काँग्रेस' ची सत्ता प्रस्थापित झाली. इंदिरा काँग्रेसच्या या विजयामुळे विरोधी शक्ती मोडून पडल्या व आघाडीच्या राजकारणाचे एक पर्व संपले, तर भारतीय राजकारणातले 'इंदिरा पर्व' जोमाने सुरू झाले.
Comments
Post a Comment